रमाई आंबेडकर यांचा त्यागपूर्ण संघर्ष अनन्यसाधारण

पिंपरी : पुणे समाचार ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या समतेच्या लढ्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी दिलेली साथ आणि प्रतिकूल परिस्थितीत केलेला त्यागपूर्ण संघर्ष अनन्यसाधारण असून अधिकार विरहित समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरीता मजबूत पाया ठरला असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता ओव्हाळ यांनी केले.

‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे जीवन चरित्र’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आज शहराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास महापालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, शहराध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, वंचित शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, रिपब्लिकन सेना शहराध्यक्ष धुराजी शिंदे, आर.पी.आय. महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संतोष जोगदंड, समता सैनिक दलाचे मेजर विनोद कांबळे, मेजर सुरेश भालेराव, मेजर सुखदेव वाहुळे तसेच विनोद गायकवाड, एम.आय.एम. शहराध्क्ष धम्मराज साळवे, अंजना कांबळे, केंद्रीय शिक्षिका आशा सरतापे व रेखा ढेकळे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे यांनी शहरवासियांना माता रमाई आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. रमाईंच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याला बळ मिळाले. समाजहितासाठी लढणाऱ्या पतीला रमाईंनी साथ दिली. समाजाची आई बनुन आधार देण्याचे काम त्यांनी केले. बाबासाहेबांनी केलेल्या क्रांती लढ्यातील रमाई प्रमुख संघर्ष नायिका आहेत असे महापौर म्हणाल्या.

सुजाता ओव्हाळ यांनी रमाईचा जीवनपट सर्वांसमोर उलगडला त्या म्हणाल्या, बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षण घेत असताना इकडे भारतात कुटुंबातील सर्वांना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी रमाईंनी स्वीकारली. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आपले उच्च शिक्षण पुर्ण करु शकले. आंबेडकरी अनुयायी त्यांना मनोभावे *त्यागमुर्ती माता रमाई* असे संबोधतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधाकांत कांबळे, (जिल्हा सरचिटणीस) यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक सरतापे, (पिं.चिं. शहर सरचिटणीस) यांनी केले. आभार अशोक यादव (उपाध्यक्ष)यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज गजभार, अनुसया कांबळे, मछिंद्र कदम, दत्ता गायकवाड, शोभा गायकवाड, शामा जाधव, रमा गायकवाड, पी.जी.भोसले, मिलिंद घोगरे, हौसराव शिंदे,मानिक निसर्गंध आदींनी परिश्रम घेतले.